![]() |
मेंढी पालन
|
महाराष्ट्राचा बराच मोठा प्रदेश विशेषतः नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे व धुळे हे जिल्हे मेंढी पाळण्यास उपयुक्त आहेत.
महाराष्ट्रात सुमारे ३०.९४ लाख मेंढ्या आहेत. दःखनी मेंढ्यामध्ये निरनिराळे वाण दिसून आलेले आहेत. त्यापैकी संगमनेरी मेंढ्या इतर मेंढ्यापेक्षा
(कोकरांची वाढ, लोकर व मटणाचे उत्पादन या दृष्टीने) सरस दिसून आलेल्या आहेत व त्यापासून निवड पद्धतीने सुधारित वाण विकसित करण्याचे काम मेंढी संशोधन केंद्र, येथे सुरू आहे.
या सुधारित वाणापासून पैदास झालेले नर हे मेंढपाळांना मेंढ्याचे उत्पादन वाढ होण्यासाठी देण्यात येत आहेत. शास्त्रीय दृष्टिकोनातून मेंढी पालनासाठी खालील महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे.
१) मेंढी विण्यापूर्वी व विल्यावर प्रमाणशीर खाद्य, भरपूर चारा द्यावा व मेंढीची उत्तम निगा राखावी.
२) पोटात होणाऱ्या जंतापासून मेंढीचे संरक्षण करावे.
३) मेंढ्याच्या कळपापासून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सशक्त मेंढ्यांची व नराची निवड करावी.
४) मेंढ्यांपासून नर तुटक ठेवल्यास नराची प्रजनन व उत्पादन क्षमता वाढते तसेच तो मेंढ्यांना त्रास देत नाही.
५) १८ महिन्यानंतर सशक्त नर २५ ते ३० मेंढ्या भरविण्यासाठी वापरता येतो.
६) पैदाशीचे नर दर दोन वर्षांनी बदलणे आवश्यक आहे. मेंढी भरविल्यानंतर विण्यास १४५ ते १४७ दिवस लागतात. मेंढ्याजून- जुलै-ऑगस्ट मध्ये माजावर येतात.
मेंढी गाभण होईपर्यंत प्रत्येक १६ ते १७ दिवसांनी माजावर येते. या काळात मेंढीला भरपूर खाद्य दिल्यास मेंढी मोठ्या आकाराच्या व जास्त वजनाच्या कोकरांना जन्म देते.
आपल्याकडील चराऊ राने निकृष्ट दर्जाची असल्यामुळे, चरून आलेल्या मेंढ्यांना त्यांच्या शारीरिक वाढीसाठी पुढीलप्रमाणे खाद्य व वैरण देणे फायद्याचे ठरेल.
या व्यवसायातील नफातोटा हा कृमी, जंत व रोग यावरील तात्काळ उपाय यावरच अवलंबून आहे. आपल्या हवामानात,
पावसाळ्यात पोटातील जंताचा फार उपद्रव असतो म्हणून पावसाळ्याच्या सुरवातीला योग्य औषध द्यावे. तर तीन महिन्यांनी मेंढ्यांना जंतांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषधे द्यावी.
मेंढ्यांची लोकर कातरल्यावर पुढील महत्त्वाचे काम म्हणजे मेंढीच्या अंगावरील उवा, गोचीड इत्यादी मारण्यासाठी मेंढ्यांना कीटकनाशके असलेल्या पाण्याच्या हौदात धुवून काढणे.
गोचीडांसाठी मेंढीच्या लोकर कातरलेल्या भागावर डेल्टामेथ्रीन (ब्युटॉक्स) औषध फवारावे. तसेच मेंढ्यांना खालील प्रमाणे लसीकरण करावे.
१) आंत्रविषार : पावसाळ्याच्या सुरवातीला मे - जून व त्यानंतर ६ महिन्यांनी.
२) घटसर्प : मे-जून त्यानंतर ६ महिन्यांनी .
३) देवी :उन्हाळ्याच्या सुरवातीस मार्च - एप्रिल.
४) लाळ खुरकूत :ऑक्टोंबर व मे महिन्यामध्ये लस टोचून घ्यावी.
५) पी. पी. आर. : तीन वर्षातून एकदा.
पावसाळ्यात मेंढीच्या खुरामध्ये चिखल्या होतात. तेव्हा महिन्यातून एकदा कॉपरसल्फेट किंवा फॉरमॅल्डिाहाईड द्रावण असलेल्या उथळ हौदातून मेंढ्या संपूर्ण खूर बुडतील अशा सोडाव्यात.
अंगावरील लोकर मशिनने काढल्यास लोकर उत्पादनात वाढ होते. अशी लोकर सलग आल्याने बाजारभावही चांगला मिळतो, कारण या पद्धतीत तुकडे पडून लोकर वाया जात नाही.
माडग्याळ मेंढी
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावचे सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहंकाळ, रांजणी या भागात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात.
माडग्याळ या गावावरूनच या मेंढ्याना हे नाव प्राप्त झाले आहे. दख्खनी मेंढ्यापेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान, रंगाने पांढऱ्या व अंगावर
तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्याची शरीरवाढ चांगली असून बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करत आहेत.
कोकराचे जन्मतः
वजन ३ ते ३.५ किलो असून तीन महिने वयाचे वेळचे वजन १८ ते २२ किलो व सहा महिने वयाचे वेळचे वजन २५ ते ३० किलो आहे. पूर्ण
वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो एवढे आहे. तीन महिने वयापर्यंत या मेंढीचे वजन वाढीचा दर १७५ ते २४० ग्रॅम प्रति दिन एवढा आहे.
या मेंढ्यांच्या अंगावर लोकर अत्यंत कमी असून त्यांची लोकर कातरणी फक्त एकदाच करतात.
शेळ्या व मेंढ्यांसाठी झाडपाला उत्तम खाद्य
झाडपाला व चवदार खाद्य पचविण्याची क्षमता शेळ्यांमध्ये मेंढ्यांपेक्षा जास्त आहे. खाल्लेल्या खाद्याच्या ७० टक्के चारा हा झाडपाल्याचा असतो असे दिसून आलेले आहे.झाडपाला व झाडाच्या चिकातील शेंगा दोन प्रकारे साठवतात.
१) झाडपाल्याचा मूरघास तयार करणे.
२) फुलोऱ्यात आलेला झाडपाला व चिकात आलेल्या शेंगा डहाळून सावलीत वाळवणे. अशा प्रकारे साठवलेला झाडपाला व झाडांच्या शेंगा, चारा व खुराक म्हणून टंचाईच्या काळात वापरता येतो.
साठवलेल्या झाडपाल्याचा व शेंगाचा उपयोग
शेळ्या व मेंढ्यांच्या दिवसभरातील खाद्यात वाळवलेल्या झाडपाल्याचा व शेंगाचा उपयोग ५० टक्क्यापर्यंत करता येतो.
भरडलेली मका व तूर किंवा हरबरा भुसा वापरून खाद्य मिश्रण तयार करून घातल्यास वाढत्या करडांची /कोकरांची शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होते, असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.
झाडपाल्यातील अपायकारक पदार्थ
सुबाभुळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाऊ घातल्यास जनावरांच्या शरीरात
अपायकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात, जनावरांची वाढ खुंटते,
जनावरे रोजचा चारा व खुराक खात नाहीत, इत्यादी अपायकारक परिणाम दिसून येतात. दिवसभरात खाऊ घातलेल्या चाऱ्यात सुबाभळीच्या चाऱ्याचे प्रमाण १/३ पेक्षा कमी ठेवल्यास कोणताही अपाय होत नाही.